किनाऱ्यावरची पाण्याची एक लाट जशी परत जाताना आपल्या पायाखालची वाळू सरकवते,
तशी काही माणसं येतात आयुष्यात,
आणि परत जाताना आपल्या पायाखालची जमीन काढून नेतात..
पायाच्या बोटांमध्ये काही टोचरे कण राहून जातात वाळूचे..
आपल्याला सहज शक्य असतं, ते कण साफ करणं, पण आपण तसं करत नाही..
आपण ते ठेवून देतो तसेच,
वेळ आल्यावर आपल्याला स्वतःला जाणीव करून द्यायला,
की नक्की काय चूक केली होती त्या व्यक्तीने,
आणि कशी आपण चूक केली होती तिच्यावर विश्वास ठेवून..
आपल्याला आपल्याच चुका लक्षात ठेवायलासुद्धा रिमाईंडर ठेवावे लागतात..
त्या व्यक्तीने दिलेल्या क्लेशाहूनही हे रिमाईंडर्स आपल्याला जास्त त्रास देत असतात..
आपल्या आयुष्याची माती करत असतात..
आपल्याला सहज शक्य असतं,
ते वाळूचे टोचरे कण साफ करणं..
का नाही करत आपण?
- समिक्षा साळुंके
- २६-०३-२०२०
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा