शनिवार, २८ मार्च, २०२०

रिमाईंडर्स...


किनाऱ्यावरची पाण्याची एक लाट जशी परत जाताना आपल्या पायाखालची वाळू सरकवते,
तशी काही माणसं येतात आयुष्यात,
आणि परत जाताना आपल्या पायाखालची जमीन काढून नेतात..

पायाच्या बोटांमध्ये काही टोचरे कण राहून जातात वाळूचे..

आपल्याला सहज शक्य असतं, ते कण साफ करणं, पण आपण तसं करत नाही..
आपण ते ठेवून देतो तसेच,
वेळ आल्यावर आपल्याला स्वतःला जाणीव करून द्यायला,
की नक्की काय चूक केली होती त्या व्यक्तीने,
आणि कशी आपण चूक केली होती तिच्यावर विश्वास ठेवून..

आपल्याला आपल्याच चुका लक्षात ठेवायलासुद्धा रिमाईंडर ठेवावे लागतात..

त्या व्यक्तीने दिलेल्या क्लेशाहूनही हे रिमाईंडर्स आपल्याला जास्त त्रास देत असतात..
आपल्या आयुष्याची माती करत असतात..

आपल्याला सहज शक्य असतं,
ते वाळूचे टोचरे कण साफ करणं..
का नाही करत आपण?


- समिक्षा साळुंके
- २६-०३-२०२० 

शुक्रवार, २७ मार्च, २०२०

माती...


आपलं नशीब चांगलं,
म्हणून मातीत माखून आल्यावर 

आधी पाठीत धपाटा घालून 
मग हात पाय धुवायला पाठवणारी आई आपल्याला मिळाली.

नाहीतर, स्वतःहून मातीत लोळायला पाठवून, 
नंतर हाय फाईव्ह वगैरे देऊन दाग अच्छे है म्हणणारी आई मिळाली असती,
तर कदाचित आपली पिढीच पृथ्वीवरची शेवटची पिढी असती..

खरं तर, मातीशी आपला एक अंतर्बाह्य संबंध आहे.
कारण जितकी अंगाला लागली,
तेवढीच पोटात सुद्धा गेली आहे..
हो, खरंच..! 
मस्करी नाही...
पाळणाघरात दुपारी झोप येत नसताना, 
भिंतीजवळ झोपायची संधी मिळाली की 
चुन्याच्या भिंतीचे पोपडे काढून हळूच मटकावलेत आपण..
उन्हाळ्याच्या सुट्टीत, गच्चीत धान्य वाळवायला टाकल्यावर, 
त्यातले काळ्या मातीचे बारीक बारीक खडे वेचून खाणारे राखणदारसुद्धा आपणच...
भुईमूगाच्या शेंगा खाताना ज्यांच्यावर जास्त माती असायची, 
अशा शेंगा सापडल्या की लॉटरी लागल्यासारखे चेहरे व्हायचे आपले..
पाटीवरची पेन्सिल लिहिण्यात कमी आणि आपल्या दातांखाली जास्त झिजायची...
पाचवीत गेल्यावर डॉक्टर डॉक्टर खेळताना, 
कॅल्शिअम कमी आहे हे निमित्त फक्त फळ्यावरच्या खडूच्या बनवलेल्या 
सुबक आणि रंगीबेरंगी गोळ्या खाण्यासाठीच तर होतं..
मला आठवतंय, मी अकरावीत केळकरला कॉलेजमध्ये जाताना 
रेल्वेच्या पुलावर एक माणूस पाटीवरच्या पेन्सिली विकायचा..
कँटीन मधला वडापाव नाही खाल्ला कधी पण 
त्याच्याकडून दर महिन्याला एक जुडी घेऊन जायचे मी खायला..

आता मोठे झाल्यावर, हे पहिल्या पावसातला मातीचा गंध वगैरे प्रकार समजले..

लहानपणी तो सुगंध म्हणजे पहिल्या पावसाची चाहूल बिहूल नव्हती काही.. 
तो होता पावसात कायदेशीररीत्या भिजण्याचा परवाना...
आणि चिखलात उड्या मारून, 
ओळखू येणार नाही एव्हढे बरबटलो, 
तरीही कोणतीही कारवाई होणार नाही, हे अभय!

कागदी होड्या-बिड्या तर आमचे आई-बाबाच 
त्यांचा नॉस्टॅल्जिया शमवायला पाण्यात सोडायचे..

मातीबद्दल वाटणारी तेव्हाची ओढ वेगळी होती..
तिची खरी किंमत तर आता मोठं झाल्यावर कळू लागली.

अख्खं बालपण मातीत घालवलं..
तेव्हा खूप खेळलो नाही असं नाही..
तरीही, आता असंच वाटत राहतं,
की शाळेच्या मैदानातल्या त्या लाल मातीत खूप खेळून घायला पाहिजे होतं..


- समिक्षा साळुंके
- २६-०३-२०२०

गुरुवार, २६ मार्च, २०२०

पंखा



पंखा म्हटलं, की सगळ्यात आधी आठवते रात्र...

अगदी लहान असताना, 
जेव्हा अर्थात ही ३x६ ची जादुई खिडकी अजून आमच्या हातात काय, 
पण कोणाच्या डोक्यातही आली नव्हती, 
तेव्हा...रात्री झोप लागण्यासाठी, माझ्याकडे दोनच पर्याय होते..
एक म्हणजे भूगोलाचं पुस्तक वाचायला घेणं
किंवा दुसरा म्हणजे अंथरुणावर पाठ टेकून वर गोल गोल फिरणाऱ्या पंख्याकडे टक लावून बघत राहणं...
अनेकदा ती हवा डोळ्यांत जाऊन जाऊन डोळे मिटायचे.
पण काही वेळा त्यानेही झोप लागत नसे..
तेव्हा मी एक खेळ खेळायचे...

महाभारतातला अर्जुन जसा पक्ष्याच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करायचा,
 तसं मी पंख्याच्या  केंद्रबिंदू वर लक्ष केंद्रित करायचे 
आणि असंच माझ्या मीच तयार केलेल्या माझ्या द्रोणाचार्यांना सांगायचे,
मला फक्त आणि फक्त पंख्याच्या मध्यातला तो पांढरा डाग दिसत आहे.. 
द्रोणाचार्य बोलायचे शाब्बास.!
आणि मी मनातल्या मनात तीर मारणार 
एवढ्यात मी टक लावून बघत असलेला तो पंखा गायब व्हायचा... 
आणि मग काही क्षण फक्त अवकाश दिसायचं...
त्या काही क्षणांपुरता श्वास रोखला जायचा..
आणि श्वास सोडला की पुन्हा पंखा दिसायला लागायचा..

कदाचित तेव्हा सगळेच जण हा खेळ खेळत असतील, 
पण मला मी जाम स्पेशल वाटायचे, की मी नुसतं नजरेने पंखा गायब करू शकते...
आणि मग मला ते ४-५ क्षण मिळवण्याची चटकच लागली.. 

थोडी मोठी झाल्यावर मी पंखा जास्तीत जास्त वेळ गायबच राहील यासाठी प्रयत्न करू लागले... 
आणि जसं जसं मी हे जाणून बुजून करू लागले, 
तसा तसा हा पंखा खूप प्रयत्न करूनही गायब होईनासा झाला.

तो गायब होण्यासाठी डोळे एका विशिष्ट प्रकारे मिटायला लागतात.
लहानपणी जे सहज होत होतं, ते जाणीवपूर्वक करायला गेल्यावर होईनासं झालं.. 
अगदी आत्तापर्यंत मला समजत नव्हतं की असं का होतंय.!
आपल्याला पंखा गायब होण्यामागचं गणित कळलंय, पण तरीही जमत का नाहीये..

काही महिन्यांपूर्वी अचानक खूप खूप विचार डोक्यात असताना झोप येत नव्हती तेव्हा समजलं.. की 
पंखा गायब झाल्यानंतर तो परत आणण्याची एकच चावी होती, 
ते म्हणजे भानावर येणे..
याचाच अर्थ असा की, पंखा गायब व्हायचा तेव्हा माझं भान हरपलेलं असायचं.. 
मी हरवलेले असायचे, 
आणि तेव्हा आयुष्यात एवढे प्रश्नच नव्हते की दुसरे विचार मनात येत राहतील 
आणि आले तरी मी ते मनावर घेईन...

पण आता?
आता वयानुरूप इतके प्रश्न, इतके विचार डोक्यात असतात, 
की मला रात्री झोपतानासुद्धा चार क्षण मोकळे मिळत नाहीत तो पंखा गायब करायला..
चार क्षण सुद्धा मी स्वतःला हरवून देऊ शकत नाहीये.. 
सतत विचार आहेत मनात..
सतत भान आहे परिस्थितीचं..
सतत जाणीव आहे आयुष्यातल्या समस्यांची..
आयुष्यात खूप बदल झालेत आता...
तो पांढरा डाग असलेला पंखा सासरी नसल्यामुळेही जमत नसेल कदाचित..
तरीही , 
अजूनही , 
मी रोज रात्री प्रयत्न करते, 
अंथरुणावर पाठ टेकल्यावर, 
त्या डोक्यावरच्या पंख्याला गायब करण्याचा..

समिक्षा साळुंके
२५-०३-२०२०