पंखा म्हटलं, की सगळ्यात आधी आठवते रात्र...
अगदी लहान असताना,
जेव्हा अर्थात ही ३x६ ची जादुई खिडकी अजून आमच्या हातात काय,
पण कोणाच्या डोक्यातही आली नव्हती,
तेव्हा...रात्री झोप लागण्यासाठी, माझ्याकडे दोनच पर्याय होते..
एक म्हणजे भूगोलाचं पुस्तक वाचायला घेणं
किंवा दुसरा म्हणजे अंथरुणावर पाठ टेकून वर गोल गोल फिरणाऱ्या पंख्याकडे टक लावून बघत राहणं...
अनेकदा ती हवा डोळ्यांत जाऊन जाऊन डोळे मिटायचे.
पण काही वेळा त्यानेही झोप लागत नसे..
तेव्हा मी एक खेळ खेळायचे...
महाभारतातला अर्जुन जसा पक्ष्याच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करायचा,
तसं मी पंख्याच्या केंद्रबिंदू वर लक्ष केंद्रित करायचे
आणि असंच माझ्या मीच तयार केलेल्या माझ्या द्रोणाचार्यांना सांगायचे,
मला फक्त आणि फक्त पंख्याच्या मध्यातला तो पांढरा डाग दिसत आहे..
द्रोणाचार्य बोलायचे शाब्बास.!
आणि मी मनातल्या मनात तीर मारणार
एवढ्यात मी टक लावून बघत असलेला तो पंखा गायब व्हायचा...
आणि मग काही क्षण फक्त अवकाश दिसायचं...
त्या काही क्षणांपुरता श्वास रोखला जायचा..
आणि श्वास सोडला की पुन्हा पंखा दिसायला लागायचा..
कदाचित तेव्हा सगळेच जण हा खेळ खेळत असतील,
पण मला मी जाम स्पेशल वाटायचे, की मी नुसतं नजरेने पंखा गायब करू शकते...
आणि मग मला ते ४-५ क्षण मिळवण्याची चटकच लागली..
थोडी मोठी झाल्यावर मी पंखा जास्तीत जास्त वेळ गायबच राहील यासाठी प्रयत्न करू लागले...
आणि जसं जसं मी हे जाणून बुजून करू लागले,
तसा तसा हा पंखा खूप प्रयत्न करूनही गायब होईनासा झाला.
तो गायब होण्यासाठी डोळे एका विशिष्ट प्रकारे मिटायला लागतात.
लहानपणी जे सहज होत होतं, ते जाणीवपूर्वक करायला गेल्यावर होईनासं झालं..
अगदी आत्तापर्यंत मला समजत नव्हतं की असं का होतंय.!
आपल्याला पंखा गायब होण्यामागचं गणित कळलंय, पण तरीही जमत का नाहीये..
काही महिन्यांपूर्वी अचानक खूप खूप विचार डोक्यात असताना झोप येत नव्हती तेव्हा समजलं.. की
पंखा गायब झाल्यानंतर तो परत आणण्याची एकच चावी होती,
ते म्हणजे भानावर येणे..
याचाच अर्थ असा की, पंखा गायब व्हायचा तेव्हा माझं भान हरपलेलं असायचं..
मी हरवलेले असायचे,
आणि तेव्हा आयुष्यात एवढे प्रश्नच नव्हते की दुसरे विचार मनात येत राहतील
आणि आले तरी मी ते मनावर घेईन...
पण आता?
आता वयानुरूप इतके प्रश्न, इतके विचार डोक्यात असतात,
की मला रात्री झोपतानासुद्धा चार क्षण मोकळे मिळत नाहीत तो पंखा गायब करायला..
चार क्षण सुद्धा मी स्वतःला हरवून देऊ शकत नाहीये..
सतत विचार आहेत मनात..
सतत भान आहे परिस्थितीचं..
सतत जाणीव आहे आयुष्यातल्या समस्यांची..
आयुष्यात खूप बदल झालेत आता...
तो पांढरा डाग असलेला पंखा सासरी नसल्यामुळेही जमत नसेल कदाचित..
तरीही ,
अजूनही ,
मी रोज रात्री प्रयत्न करते,
अंथरुणावर पाठ टेकल्यावर,
त्या डोक्यावरच्या पंख्याला गायब करण्याचा..
समिक्षा साळुंके
२५-०३-२०२०